
Lokurja Digital
देगलूर | प्रतिनिधी
देगलूर – तालुक्यातील हाणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या देण्यात आलेल्या मांसाहार भोजनातून गंभीर विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्रमशाळेत वास्तव्यास असलेल्या ३२ विद्यार्थ्यांना जेवणानंतर लगेच उलट्यांचा त्रास झाल्याने तब्येत खलावली घटनेची माहिती मिळता पालकात रडारड सुरू झाली.
बाधित विद्यार्थ्यांपैकी २८ मुले आणि ८ मुली असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना तातडीने देगलूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. निवासी विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी शाळा प्रशासनावर असताना भोजनाच्या गुणवत्तेबाबत एवढी गंभीर घटना घडणे ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे.

भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्हविद्यार्थ्यांच्या आहारासाठी शासनाकडून भरपूर निधी व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि तयार करण्याची पद्धत यावर नियमित देखरेख होते का ? असा सवाल उपस्थित होत आहे.विद्यार्थ्यांच्या आहारात निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त पदार्थ वापरले जात असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे. भोजनात वापरलेले चिकन व भोजनाचे नमुने तातडीने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
अधीक्षक, मुख्याध्यापकांसह भोजन समितीची चौकशी कराया घटनेची केवळ वरवर चौकशी न करता आश्रमशाळेचे अधीक्षक, मुख्याध्यापक, भोजन व्यवस्था पाहणारी समिती तसेच विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रकार असल्याने दोष आढळल्यास संबंधितांवर निलंबनासह कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
पालकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर?आपली मुले सुरक्षित राहतील, त्यांना वेळेवर पौष्टिक आणि सकस आहार मिळेल आणि शाळेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, या विश्वासाने पालक आपल्या मुलांना निवासी आश्रमशाळेत पाठवतात. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेतील भोजनातूनच विषबाधा झाल्याची घटना समोर आल्याने पालकांचा हा विश्वास डळमळीत झाला आहे.
शाळेत विद्यार्थ्यांच्या भोजनाची गुणवत्ता तपासण्यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत आहे? भोजनाचे नमुने नियमित घेतले जातात का? स्वयंपाकघराची स्वच्छता आणि अन्नसाठ्याची तपासणी केली जाते का? विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता कोण तपासते? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे गरजेचे आहे. घटनेची सखोल चौकशी होणार का? हाणेगाव येथील या घटनेला केवळ विद्यार्थ्यांना झालेला आरोग्याचा त्रास म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही.
निवासी विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित प्रश्न असल्याने शासनाच्या संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून संपूर्ण भोजन व्यवस्थेचे ऑडिट करावे, अशी मागणी होत आहे.विद्यार्थ्यांच्या भोजनाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणे, स्वयंपाकघर व अन्नसाठ्याची पाहणी करणे, भोजन पुरवठ्याशी संबंधित नोंदी तपासणे तसेच विद्यार्थ्यांना भोजन पुरवणाऱ्या यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांच्या ताटात सकस आहाराऐवजी निष्काळजीपणा वाढत असेल, तर ही केवळ प्रशासकीय चूक नसून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार ठरू शकतो. त्यामुळे प्रशासन आता तरी जागे होणार का आणि या घटनेतील खरे दोषी कोण, याचा पर्दाफाश होणार का, याकडे पालकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.



